पाऊस
पाऊस म्हणजे सृष्टीला नवचैतन्य देणारा, पाऊस म्हणजे चिखल सारा,पाऊस म्हणजे गार वारा ,पाऊस म्हणजे मरगळ,
थोडक्यात काय तर कुणाला आनंद देणारा तर कुणाला कंटाळवाणी वाटणारा हा पाऊस.
रखरखत्या उन्हाळ्यानंतर पहिला पाऊस पडल्यावर येणारा
मातीचा तो सुगंध, त्याला कशाचीही तोड नाही.पहिला पाऊस मनात आठवणींच घर करुन जातं.पाऊस
पडल्यानंतर अगदी वातावरणाला शांत करत एक प्रसन्न सुवास दरवळत असतो.लहानपणी शाळेतून
येताना भिजने,कागडाच्या होड्या करून पाण्यात सोडणे हे किती मजेदार होत नाही
का.आईजवळ पावसात भिजण्यासाठी केलेला हट्ट.नवविवाहित जोडप्याला तर पहिला
पाऊस अतिशय रोमांचक अनुभव असतो. अविस्मरणीय दिवस असतात ते.प्रेमी लोकांना पावसात
आपलं प्रेम आठवतं. त्याच्या/तिच्या गोड प्रेमळ आठवणी पावसात पुन्हा ओल्या होतात. खरचं
पाऊस किती सुखमय वाटणारा असतो ना..पावसात ट्रेकिंग करण्याची तर मजाच वेगळी. निसर्गाचं
सौंदर्य अगदी खुलून दिसत असतं. अशा वेळी आपल्या जवळच्या व्यक्ती सोबत पावसात फिरताना
आणि भिजतानाचा तो अनुभव,न विसरता येणारा असतो.पाऊस
या विषयाशी संबंधित खूप गाणी आहेत, कविता तर असंख्य असतील. पावसाच्या वेगवेगळ्या संकल्पना कवी आणि लेखकांनी मांडल्या आहेत.म्हणतात ना,"जे न देखे रवि ते देखे
कवि" हे अगदी खरे आहे. अहो पावसाळ्याच्या दिवसात ढगाआड झाकून गेल्यामुळे सूर्यालाही कदाचित पृथ्वीवरचे स्पष्ट दिसत नसेल, पण अंधारातले किंवा अस्तित्वात नसलेले सुध्दा पाहण्याची दिव्यदृष्टी कवींकडे असते. म्हणूनच पावसाला साजेशा कविता ज्या कवींनी उत्स्फूर्तपणे लिहिल्या आहेत त्यातली माझ्या ओळखीतली प्रसिध्द अशी गीते गेले काही दिवस मी आठवून आठवून ती या ठिकाणी ब्लॉगवर लिहिणार आहे.अर्थातच ही सर्व गाणी फक्त मराठी भाषेतली आहेत.प्रत्येकाच्या
आयुष्यात, मनात पावसाच्या वेगवेगळ्या आठवणी साठवलेल्या असतात. कधी एकटं बसून चहा कॉफी
घेत पाऊस बघत की पावसातील गमतीजमती आठवतात. .अशाच तुमच्या गमतीजमती नक्की
कळवा.चला तर मग थंड हवा,गारवा, ढगाळ आकाश,
धुक्यात डोंगर आणि मातीचा गंध, कड़क चहा,चिंब भिजायला तयार रहा, पहिल्या पावसाच्या
पहिल्या आठवणी जगायला तयार रहा...आणि अजुन काही पावसाच्या तुमच्या
आवडीच्या कविता ही सांगा.धन्यवाद।
1. रिमझिम धून, आभाळ भरुन/Rimzim dhun, Aabhal bharun
रिमझिम धून, आभाळ भरुन
हरवले मन, येणार हे कोण ?
मन फुलांचा थवा, गंध हा हवा हवा
वाहतो वारा नवा, जुन्यात हरवून
गूज मनीचे मनाला, आठवूनी त्या क्षणाला
सांगावे का माझे मला, उगाच मनात बावरुन
वार्यात गाणे कुणाचे, गाण्यात वारे मनाच
मनाच्या वार्यात आता, सुरात तुला मी कवळून
Lyrics-सौमित्र
पाऊस आला रे आला
धारा झेला रे झेला...
झाडे झाली हिरवी गाणी
कधी अचानक येतो म्हणतो
पाऊस गाण्यासवे मुलांच्या
हळव्या गंधासवे फुलांच्या
गाणे झाला रे झाला
पाऊस आला रे आला
रुणझुण पैंजण पानोपानी
सुगंध ओला रे ओला
पाऊस आला रे आला
काळ्या काळ्या नौकेपरी ढग
झुलू लागले क्षितिजावर बघ
डोंगर न्हाला रे न्हाला
पाऊस आला रे आला
येताच नाही चकवा देतो
रिमझिम झाला रे झाला
पाऊस आला रे आला
३.पाऊस दाटलेला /Paus Datlela
पाऊस दाटलेला,माझ्या घरावरी हा
दारास भास आता,हळूवार पावलांचा
गवतास थेंब सारे,बिलगून बैसलेले
झाडावरुन पक्षी, सारे उडून गेले
पाऊल वाट सारी,रात्री भिजून गेली
निथळून साचलेले,तळवा भिजेल आता,
हळूवार पावलांचा
जेव्हा भिजून गेले,पंखात नाद त्यांच्या
हळूवार पावलांचा
विसरुन तीच गेली,ओला ठसा कुणाच्या
हळूवार पावलांचा
Lyrics-सौमित्र
Music -मिलिंद इंगळे
Singer -मिलिंद इंगळे
Movie / Natak / Album - गारवा
4.चिंब पावसानं रानं झालं आबादानी/ Chimb Pavasan Ran Zal Aabadani
चिंब पावसानं रानं झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरली, चांदणं गोंदणी
झाकू नको कमळनबाई एकांताच्या कोनी
रूपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी
राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी
उन्हात चांदणं आलं लाज पांघरूनी
झाकू नको कमळनबाई, सखे लावण्याची खाणी
तुझ्या डोळ्यांच्या सांदीत सावल्यांची राणी
पान्यामंदी झिम्मा धरं आभाळ अस्मानी
झाकू नको कमळनबाई, चांदणं गोंदणी
अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी
सांगता ना येई काही साजणा बोलांनी
झाकू नको कमळनबाई, सखे लावण्याची खाणी
ना.धो.महानोर
वाऱ्यावर भिर-भिर-भिर
पारवा
पारवा
नवा नवा
प्रिये, नभात ही
चांदवा नवा नवा
गारवा
गवतात गाणे झुलते कधीचे
गवतात गाणे झुलते कधीचे
हिरवे किनारे, हिरव्या
नदीचे
हिरवे किनारे, हिरव्या
नदीचे
पाण्यावर सर-सर-सर
काजवा
नवा नवा
प्रिये, मनात ही
ताजवा नवा नवा
गारवा
आकाश सारे माळून तारे
आता रुपेरी झालेत वारे
आकाश सारे माळून तारे
आता रुपेरी झालेत वारे
अंगभर थर-थर-थर नाचवा
नवा नवा
प्रिये, तुझा जसा
गोडवा नवा नवा
गारवा
वाऱ्यावर भिर-भिर-भिर
पारवा
नवा नवा
प्रिये, नभात ही
चांदवा नवा नवा
गारवा
गारवा
Lyrics-सौमित्र
Music -मिलिंद इंगळे
Singer -मिलिंद इंगळे
Movie / Natak / Album - गारवा
6.
ऋतु हिरवा, ऋतु बरवा, पाचूचा वनि रुजवा/Rutu Hirva,Rutu Barva
ऋतु हिरवा, ऋतु बरवा, पाचूचा वनि रुजवा ।
ऋतु हिरवा, ऋतु बरवा, पाचूचा वनि रुजवा ।
युग विरही हृदयांवर सरसरतो मधु शिरवा ।। ऋतु हिरवा ।।
भिजुनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती ।
नितळ निळ्या अवकाशी मधुगंधी तरल हवा ।।
मनभावन हा श्रावण, प्रियसाजण हा श्रावण ।
भिजवी तन, भिजवी मन हा श्रावण ।।
थरथरत्या अधरांवर प्रणयी संकेत नवा ।।
नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप जणू ।
गगनाशी धरणीचा जुळवितसे सहज दुवा ।।
-शांता शेळके
7.
आला आला वारा संगे पावसाच्या धारा/Aala Aala Vara
आला आला वारा संगे पावसाच्या धारा ।
आला आला वारा संगे पावसाच्या धारा ।
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा ।।
नव्या नवतीचं बाई लकाकतं रूप ।
माखलं ग ऊन जणू हळदीचा लेप ।
ओठी हसू पापणीत आसवांचा झरा ।।
आजवरी यांना किती जपलं जपलं ।
काळजाचं पानी किती शिपलं शिपलं ।
चेतवून प्राण यांना दिला ग उबारा ।।
येगळी माती आता ग येगळी दुनिया ।
आभाळाची माया बाई करील किमया ।
फुलंल बाई पावसानं मुलुख ग सारा ।।
- सुधीर मोघे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे
मेघ कसे बघ गडगड करिती
विजा नभांतुन मला खुणविती
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे
खिडकीखाली तळे साचले
गुडघ्याइतके पाणी भरले
तऱ्हेतऱ्हेच्या होड्यांची मज शर्यत ग लावु दे
बदकांचा बघ थवा नाचतो
बेडुक दादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे
धारेखाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप, खोकला, शिंका, सर्दी, वाट्टेल ते होऊ दे
-वंदना विटणकर
11.पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने/Paus Kadhicha Pdto aahe,zadanchi halati pan
पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने ।
हलकेच जाग मज आली, दु:खाच्या मंद सुराने ।।
डोळ्यांत उतरते पाणी, पाण्यावर डोळे फिरती ।
दु:खाचा उडला पारा, या नितळ उतरणीवरती ।।
पेटून कशी उजळेना, ही शुभ्र फुलांची ज्वाला ?
ताऱ्यांच्या प्रहरापाशी, पाऊस असा कोसळला ।।
संदिग्ध घरांच्या ओळी, आकाश ढवळतो वारा ।
माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा ।
-ग्रेस
ढगाला उन्हाची केवढी झळ
थोडी न् थोडकी लागली फार
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार
वारा वारा गरागरा सो सो सूम्
ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम
वीजबाई अशी काही तोऱ्यामधे खडी
आकाशाच्या पाठीवर चमचम छडी
खोलखोल जमिनीचे उघडून दार
बुडबुड बेडकाची बडबड फार
डुंबायला डबक्याचा करूया तलाव
साबु-बिबु नको थोडा चिखल लगाव
-संदीप खरे
मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले ।
घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले ।।
पाऊस पाखरांच्या पंखांत थेंब थेंबी ।
शिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी ।।
मन चिंब पावसाळी …….
घरट्यात पंख मिटले झाडात गर्द वारा ।
गात्रात कापणारा ओला फिका पिसारा ।
या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे ।
आकाश पांघरोनी मन दूरदूर जावे ।।
मन चिंब पावसाळी …….
रानात एककल्ली सुनसान सांजवेळी ।
डोळ्यात गल्बताच्या मनमोर रम्य गावी ।
केसात मोकळ्या त्या वेटाळुनी फुलांना ।
राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे ।।
मन चिंब पावसाळी मेंदीत माखलेले
त्या राजवंशी कोण्या डोळ्यात गुंतलेले
मन चिंब पावसाळी ………
-ना. धो महानोर
घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा ।
केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा ॥धृ.।।
कालिंदीच्या तटी श्रीहरी ।
तशात घुमवी धुंद बासरी ।
एक अनामिक सुगंध येतो, ओल्या अंधारा ॥१॥
कोसळती धारा ।।
वर्षाकालिन सायंकाली ।
लुकलुक करिती दिवे गोकुळी ।
उगाच त्यांच्या पाठिस लागे भिरभिरता वारा ॥२॥
कोसळती धारा ।।
कृष्णविरहिणी कोणी गवळण ।
तिला अडविते कवाड, अंगण ।
अंगणी अवघ्या तळे साचले, भिडले जल दारा ॥३॥
कोसळती धारा ।।
-ग. दि. माडगूळकर
सांग सांग भोलानाथ
सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचुन, सुट्टी मिळेल काय ?
भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ?
भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा ,
आठवड्यातून रविवार, येतील का रे तीनदा ?
भोलानाथ उद्या आहे, गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर ?
भोलानाथ भोलानाथ चॉकलेट मिळेल काय ?
आकाशातून वेफर्सचा पाऊस पडेल काय ?
भोलानाथ जादूचा शंख मिळेल काय ?
भोलानाथ परीसारखे पंख देशील काय ?
सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ?
-योगेश खडीकर
16. पाऊस आला, वारा आला, पान लागले नाचू/Paus aala,Vara Aala
16. पाऊस आला, वारा आला, पान लागले नाचू/Paus aala,Vara Aala
पाऊस आला, वारा आला, पान लागले नाचू ।
थेंब टपोरे गोरे गोरे, भर भर गारा वेचू ।।
गरगर गिरकी घेते झाड, धडधड वाजे दार कवाड ।
अंगणातही बघता बघता, पाणी लागे साचू ।।
अंगे झाली ओलीचिंब, झुलू लागला दारी लिंब ।
ओली नक्षी, पाऊसपक्षी, कुणी पाहतो वाचू ।।
ओसरुनी सर गेली रे, उन्हे ढगांतुन आली रे ।
इंद्रधनुष्यामध्ये झळकती, हिरे माणके पाचू !
-सुष्मा श्रेष्ठ
ये रे घना, ये रे घना, न्हाउ घाल माझ्या मना ।।
फुले माझि अळुमाळु, वारा बघे चुरगळू ।
नको नको म्हणताना, गंध गेला रानावना ।।
ये रे घना ।।
टाकुनिया घरदार नाचणार, नाचणार ।
नको नको म्हणताना, मनमोर भर राना ।।
ये रे घना ।।
नको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू ।
बोलावतो सोसाट्याचा, वारा मला रसपाना ।।
ये रे घना ।।
-ना.धो. महानोर
जो काल इथे आला तो पाऊस वेगळा होता ।
आभाळ निराळे होते, तो मेघ वेगळा होता ।।
ओलेत्या चिंब क्षणीही रक्तात निखारे होते ।
ती जुनीच होती सलगी, पण स्पर्श कोवळा होता ।।
वेचली फुले थेंबांची ओठही फुलांचे होते ।
डोळ्यांत पावसामधला निथळता जिव्हाळा होता ।।
पाऊस असा आला की अद्याप थांबला नाही ।
ह्या अशा पावसासाठी सोसला उन्हाळा होता ।।
-संगीता जोशी
वादलवारं सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो ।
भिरभिर वाऱ्यात, पावसाच्या माऱ्यात,
सजनानं होडीला पान्यात लोटलंय् ।।
वादलवारं सुटलं गो !
गडगड ढगांत बिजली करी ।
फडफड शिडात धडधड उरी ।
एकली मी आज घरी बाय ।
संगतीला माझ्या कुनी नाय ।
सळसळ माडांत, खोपीच्या कुडात,
जागनाऱ्या डोल्यांत सपान मिटलं ।।
वादलवारं सुटलं गो !
सरसर चालली होडीची नाळ ।
दूरवर उठली फेसाची माळ ।
कमरेत जरा वाकूनिया ।
पान्यामंदी जालं फेकूनिया ।
नाखवा माजा, दर्याचा राजा,
लाखाचं धन त्यानं जाल्यात लुटलं ।।
वादलवारं सुटलं गो !
-शांता शेळके
श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा ।
उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा ।।
जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी ।
जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी ।
माझ्याही ओठांवर आले नाव तुझेच उदारा ।।
रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी ।
निळ्या रेशमी पाण्यावरती थेंबबावरी नक्षी ।
गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा ।।
पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदिचे आले ।
माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरू झाले ।
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा ।।
पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा ।
अशा प्रीतिचा नाद अनाहत, शब्दावाचुन भाषा ।
अंतर्यामी सूर गवसला, नाही आज किनारा ।।
-मंगेश पाडगावकर
-मंगेश पाडगावकर
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे ।
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे ।।
वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे ।
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे ।।
झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा ! तो उघडे ।
तरूशिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे ।।
उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा ।
सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा ।।
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते ।
उतरूनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते ।।
फडफड करूनी भिजले अपुले पंख पाखरे सावरिती ।
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती ।।
खिल्लारे ही चरती रानीं, गोपही गाणी गात फिरे ।
मंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरे ।।
सुवर्णचंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला ।
पारीजातही बघता भामारोष मनीचा मावळला ।।
-बालकवी
नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं ।
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात ।।
अशा वलंस राती, गळा शपथा येती ।
साता जल्मांची प्रीती, सरंल दिनरात ।।
वल्या पान्यात पारा, एक गगन धरा ।
तसा तुझा उबारा, सोडून रीतभात ।।
नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू ।
गाठ बांधला शालू, तुझ्याच पदरा ।।
भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची
कुठे दिवा नव्हता, गगनी एक ही न तारा ।
आंधळ्या तमातुन वाहे आंधळाच वारा ।
तुला मुळी नव्हती बाधा भीतिच्या विषाची ।।
क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती ।
नावगाव टाकुनि आली अशी तुझी प्रीती ।
तुला परी जाणिव नव्हती तुझ्या साहसाची ।।
केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली ।
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली ।
श्वासांनी लिहिली गाथा प्रीतिच्या रसाची ।।
सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास ।
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास ।
सुखालाहि भोवळ आली मधुर सुवासाची ।।
-मंगेश पाडगांवकर
तुमच्या आयुष्यात पावसातल्या अशा आठवणी असतील आणि आठवणींमधल्या कविता कमेंट मध्ये नक्की लिहा.
धन्यवाद।
तुमच्या आयुष्यात पावसातल्या अशा आठवणी असतील आणि आठवणींमधल्या कविता कमेंट मध्ये नक्की लिहा.
धन्यवाद।
- https://marathikavitakattaa.blogspot.com
- काही कवितांचे ऑडिओ :https://anchor.fm/KrutiKavya





















No comments:
Post a Comment